सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाला अवघे पाच महिने झाले असतानाच एका १९ वर्षीय नवविवाहितेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथे २ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उज्ज्वला नितीन नरोटे (वय १९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे माहेर घाटनांद्रा (ता. बुलढाणा) येथे असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वसई येथील नितीन नरोटे यांच्यासोबत झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वला तीन दिवसांपूर्वी माहेरी आली होती. २ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ती वडिलांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र तिचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
या प्रकरणी राजेंद्र बबन कन्नर यांनी रायपूर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नीलेश सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास खार्डे व सहकारी पुढील तपास करत आहेत.














