चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील मलगी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गावातील मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका तक्रारदाराने ग्रामपंचायत कार्यालयात अनेक वेळा तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, गावात अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांच्या बाजूने आवश्यक असलेली साईड गटारे बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, गावाला हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात गावाच्या परिसरात अनेक नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र दिसत असल्याचा दावाही आणि बुलडाणा कव्हरेज शी बोलताना सांगण्यात आला आहे. याशिवाय गावातील अनेक गटारे तुंबलेली असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व बाबींबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवक व सरपंचांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. “ग्रामपंचायतीच्या कारभारात नेमके काय सुरू आहे? ग्रामसेवकाची जबाबदारी नेमकी काय?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणाची केवळ कागदोपत्री माहिती न घेता गटविकास अधिकाऱ्यांनी मलगी गावात प्रत्यक्ष भेट देऊन सखोल चौकशी करावी व वस्तुस्थितीची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
(टीप : या वृत्तातील आरोप तक्रारदाराने केलेले असून, संबंधित ग्रामसेवक, प्रशासनाची भूमिका मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)















