मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
तालुक्यातील राजूर येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, राजूर येथील एका महिलेची मुलगी मोताळा येथील विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. २९ जून रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता ती शाळेसाठी घरातून निघाली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. नातेवाईक, मैत्रिणी व इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतरही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.
फिर्यादीनुसार, मुलगी घरातील सुमारे ४० हजार रुपये, काही कपडे व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन गेली आहे. तसेच २९ जून रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता मुलीचे वर्णन:
- वय : १५ वर्षे
- उंची : सुमारे ५ फूट
- बांधा : मध्यम
- रंग : गोरा
- चेहरा : गोल
- केस : लांब
- अंगात : गुलाबी रंगाचा टॉप व निळी जीन्स
या प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार बळीराम खंडागळे करीत आहेत.
आवाहन: संबंधित मुलीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ बोराखेडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.













