चांडोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) धाड पोलीस स्टेशन हद्दीतील चांडोळ येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून मुलीचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय १७ वर्षे १० महिने ६ दिवस) ही चांडोळ येथील रहिवासी असून ती राजेर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय (म्हसला बृद्रुक) येथे विज्ञान शाखेत इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली असून सध्या सुट्ट्यांमुळे ती घरीच होती.
४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते घरी परत आले असता मुलीने त्यांना जेवण वाढले. त्यानंतर ते पुन्हा कामासाठी बाहेर पडले. मात्र, दुपारी २ वाजता मुलगा फोनवरून बहिण घरी नसल्याची माहिती देताच वडिलांनी तातडीने घरी धाव घेतली. त्यांनी गावात, नातेवाईकांकडे आणि शेजारीपाजारी शोध घेतला, मात्र मुलीचा काहीही मागमूस लागला नाही.
दरम्यान, तपासात समोर आले की गावातीलच लखन फुलसिंग मेहेर (वय २२ वर्ष) याच्याशी मुलीचा काही दिवसांपासून संपर्क होता. दोघेही लपून-छपून भेटत असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी संबंधित युवकानेच मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार धाड पोलीस स्टेशनमध्ये दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी ५ मार्च २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस पुढील तपास करत असून, मुलीचा शोध सुरू आहे.












