चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – तालुक्यातील शेलूद येथील दिव्या अशोक नवले (वय १८ वर्षे १९ दिवस) ही तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. २१ तारखेच्या रात्री आईसोबत जेवण करून झोपल्यानंतर सकाळी उठून पाहिले असता ती घरात आढळून आली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दीपक ऊर्फ विराट शेळके या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून, संबंधित तरुणाचा देखील शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीन ते नुकतेच सज्ञान झालेल्या तरुण-तरुणींच्या निर्णयक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ‘१८ वर्ष पूर्ण होताच स्वातंत्र्य’ या संकल्पनेतून घेतले जाणारे अशा प्रकारचे निर्णय कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.











