मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “ठाकरे हाच एकमेव ब्रँड आहे, इतर फक्त बँड आहेत. ठाकरेंना संपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संपणारे नाहीत, तर संपविणारे आहेत,” असे ठाम मत मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.
मेहकर येथील शिवसेना जनसंवाद कार्यालयात आयोजित तातडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, अॅड. आकाश घोडे, संजय वडतकर, डॉ. शेषराव बदर, सुरेश सरकटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाशिम, यवतमाळ आणि हिंगोली येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळालेला मोठा प्रतिसाद, तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी वाढती जवळीक आणि कथित ‘टायगर-३ मिशन’मध्ये स्वतःचा समावेश असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“उद्धव साहेबांनी आणि मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शिवसेनेतील १४ आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. काही जण वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी पक्ष सोडून गेले. ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्याकडे नैतिक विचारधारा नाही,” असा घणाघात आ. खरात यांनी केला.
ना. प्रतापराव जाधव यांच्याशी असलेल्या सलगीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रतापराव जाधव हे जिल्ह्याचे खासदार आणि केंद्र सरकारमधील मंत्री आहेत. समाजकारण आणि राजकारणात त्यांचे स्थान मोठे आहे. मात्र त्यांची राजकीय दिशा आणि माझी दिशा वेगळी आहे. माझे प्रेरणास्थान उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत.”
यावेळी टायगर-३ मिशनमध्ये सहभागी असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच ठामपणे कार्यरत असल्याचे आ. सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट केले.
















