डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):
माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या एका वादग्रस्त निवेदनामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. “स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांची नावे आणि फोटो जाहीर करावेत,” अशी अजब आणि संतापजनक मागणी त्यांनी केली आहे.
सावजी यांनी आपल्या निवेदनात बलात्काराचे दोन प्रकार असल्याचे म्हटले आहे. एक जबरदस्तीने होणारा आणि दुसरा स्वार्थ, पैसा किंवा इतर कारणांसाठी ‘स्वतःहून करवून घेतलेला’. जबरदस्तीच्या प्रकरणात पीडितेची ओळख गुप्त ठेवावी, मात्र दुसऱ्या प्रकारातील महिलांना समाजासमोर आणावे, असे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय अशा महिलांना त्यांनी “व्यभिचारी” असे संबोधत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. त्यांच्या मते, यामुळे समाजात नैतिकता टिकेल आणि खोट्या आरोपांना आळा बसेल.
दरम्यान, बलात्कार हा गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असताना अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने सामाजिक वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महिलांच्या सन्मान आणि कायद्याच्या तरतुदींविषयी अशा वक्तव्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही नाशिक येथील एका प्रकरणात सावजी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. आता पुन्हा राज्यपालांकडे अशा स्वरूपाची मागणी केल्याने हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.













