अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस कुऱ्हाडीच्या दांड्याने व काठीने मारहाण केल्याची घटना अंढेरा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक अर्जुन सानप (वय ६० वर्ष) हे १ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.५० वाजता त्यांच्या शेतात जात होते. दरम्यान, आरोपींच्या शेताजवळ पोहोचल्यावर त्यांना थांबवून “माझ्या शेतातून जायचे नाही,” असे सांगण्यात आले. त्यानंतर वाद न घालता फिर्यादी आपल्या गोठ्याकडे निघून गेले.
मात्र, त्यानंतर आरोपी फिर्यादीच्या गोठ्यावर पोहोचले आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर दामोदर अर्जुन सानप यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने तर जिजा दामोदर सानप यांनी काठीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, त्यांची पत्नी घटनास्थळी धावून आल्याने वाद थांबला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी दामोदर अर्जुन सानप व जिजा दामोदर सानप, दोघेही रा. अंढेरा, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












