चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी ३० एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. महिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
“पाणी आमचा हक्क आहे”, “गावाला पाणी मिळालेच पाहिजे”, “नियोजनशून्य कारभाराचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पाण्यासाठी नागरिकांना दररोज वनवण भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून योग्य नियोजनाच्या अभावामुळे गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी (BDO) समाधान वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. पाणी प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास ५ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला.
ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत त्वरित आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.















