संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : माहेरून उपजीविकेसाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विधवा विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी सासरा, दिर आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती शांताराम पांडे, रा. कवठळ, ह.मु. अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सासरे गोपाल संपत पांडे, दिर मारोती गोपाल पांडे (दोघे रा. कवठळ) तसेच नणंद सोनी अरुण मेहेगे (रा. जयसिंग, जि. अमरावती) यांनी संगनमत करून त्यांच्याकडे माहेरून स्वतःच्या व मुलांच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पैशांसाठी वारंवार तगादा लावत आरोपींनी त्यांचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला.
या प्रकरणी तामगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, ११५(२) व ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुनील सुशिर करीत आहेत.
















