मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बारावीच्या निकालाच्या तणावातून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील आकारेश्वर नगर परिसरात घडली. साहील संजय राणे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो वाकोडे येथील विविध विकास ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, साहील हा गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत चिंतेत होता. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याने त्याच्यावर मानसिक ताण वाढला होता. १ मे रोजी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेतली; मात्र त्यावेळी उशीर झाला होता.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार निकालाच्या तणावातूनच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात साहीलला सुमारे ६० टक्के गुण मिळाल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि निकालाबाबतची भीती याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.














