बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):शेतीच्या वाटणीच्या जुन्या वादातून पेरणी सुरू असताना एका महिलेवर विळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुईखेड मायंबा येथे घडली. या प्रकरणी दीर व जाऊविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना जगदेव उगले (रा. रुईखेड मायंबा, ता. जि. बुलढाणा) यांच्या शेजारी आरोपी गणेश देवराव उगले (वय ६०) व गणाबाई गणेश उगले (वय ४५) यांची शेती आहे. शेतीच्या वाटणीच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मागील दहा वर्षांपासून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दि. २६ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गट क्रमांक ४४ मध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोयाबीनची पेरणी सुरू असताना आरोपींनी ट्रॅक्टर अडवून वाद घातला. यावेळी गणाबाई उगले यांनी हातातील विळ्याने वंदना उगले यांच्या डोक्यावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
जखमी महिलेवर उपचार सुरू असून, त्यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.













