बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या विवाह हंगामात केवळ वधू-वरांच्या कुटुंबीयांचीच नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदारसंघातील नागरिकांकडून प्रेमाने दिलेल्या आमंत्रणाचा मान राखण्यासाठी आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती संचालक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यांना एकाच दिवशी अनेक विवाह सोहळ्यांना उपस्थित राहावे लागत आहे. अनेकदा एका दिवसात १० ते १५, तर काहीवेळी २० पेक्षाही अधिक लग्नसमारंभांना हजेरी लावण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर येत आहे.
सध्या लग्नांचा हंगाम जोरात सुरू असल्याने प्रत्येक गावात शुभकार्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशा वेळी वधू-वरांना शुभेच्छा देणे, कुटुंबीयांची भेट घेणे आणि जनसंपर्क टिकवून ठेवणे हे लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांची सतत धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शेतकरी नेते रविकांत तुपकर, अँड शर्वरी ताई तुपकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, आमदार श्वेता ताई महाले, आमदार संजय गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या डॉ. ज्योतीताई खेडेकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ, संतोष काळे, विष्णु घुबे, संतोष भुतेकर, शरद हाडे, नंदु कऱ्हाडे, योगेश जाधव,यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना मतदारसंघातील प्रत्येक लग्नात उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा लागत आहे.
थोडक्यात, सध्याचा विवाह हंगाम हा केवळ वधू-वरांसाठी आनंदाचा काळ नसून, लोकप्रतिनिधींसाठीही ‘जनसंपर्काचा बिझी सीझन’ ठरत असल्याची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे.













