वळती (बुलडाणा कव्हरेज न्युज):मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वळती गावात काल मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धन व हरित गावाच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित वळती गाव हरित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन चिखलीच्या आमदार सौ. श्वेता ताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वळती गावाला आदर्श गाव बनवायचे आहे.” त्यांच्या या शब्दांनी ग्रामस्थांमध्ये नवी ऊर्जा संचारली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी कॉलेजच्या वतीने एनएसएस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छता, वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत सामाजिक जबाबदारीचे भान दाखवले.
या प्रसंगी सरपंच सौ. उज्ज्वलाताई चिंचोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष पवार, गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, ग्रामसेवक श्री. अभय पाटील, पत्रकार सुधीर चेके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून पर्यावरणाबाबत जनजागृती होऊन भविष्यात वळती गाव अधिक हरित, स्वच्छ व समृद्ध बनेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.














