चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील एमआयडीसी परिसरात २५ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. सुरुवातीला दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक जखमी होता. मात्र, गंभीर जखमी युवकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ही दुर्घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील खैरव येथील वैभव रामदास शिंदे, श्रीकिसन हनुमान सुरुशे (रा. पाटोदा) व संकेत प्रकाश खोसे (रा. खैरव) हे जेसीबीसाठी साहित्य आणण्यासाठी सियाज कारने सिन्नर येथे गेले होते. सिन्नर एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात संकेत खोसे व श्रीकिसन सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैभव शिंदे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचीही प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच खैरव गावातील सरपंच गजानन शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी सिन्नरकडे धाव घेतली. मृतदेहांवर खैरव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे खैरव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.












