खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव शहरातील चांदमारी फुकटपुरा परिसरातून एक महिला व तिची तीन मुले घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण अचानक घरातून निघून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृष्ण सूर्यभान गायकवाड (वय ४७, व्यवसाय चालक, रा. चांदमारी फुकटपुरा, खामगाव) हे १० जून २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतले. त्यावेळी त्यांची पत्नी रंजना श्रीकृष्ण गायकवाड (वय ४०), मुलगा पवन श्रीकृष्ण गायकवाड (वय १४), मुलगी पायल श्रीकृष्ण गायकवाड (वय १२) व मुलगा आशीष श्रीकृष्ण गायकवाड (वय ९) हे घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरातील चौघेही कोणालाही कोणतीही माहिती न देता घरातून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर श्रीकृष्ण गायकवाड यांनी शेजारी, नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला. मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर त्यांनी खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी मिसिंग नोंद करून महिला व तिच्या तीन मुलांचा शोध सुरू केला आहे.
“आईसह तीन मुलं अचानक गायब; खामगावात एकाच कुटुंबातील चौघांच्या बेपत्ता होण्याने खळबळ!” अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.













