लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) :बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून मागील काही दिवसांत बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या सात दिवसांत तब्बल १३ व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जिल्हाभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच लोणार पोलीस ठाणे अंतर्गत गेल्या दोन दिवसांत दोन स्वतंत्र बेपत्ता होण्याच्या घटना उघडकीस आल्या असून, त्यामुळे लोणार तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत, उल्कानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणार शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या दिपाली सुनील शिंदे (वय २७) यांची १३ वर्षीय भाची आंचल कृष्णा सोळंके हिचे अज्ञात इसमाने अपहरण केले. ही घटना ३ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात व्यक्तीने मुलीला खोटे आमिष दाखवून फूस लावली व तिला पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दिपाली शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत येवती (ता. लोणार) येथील वैभव शंकर नागरे (वय २५) हा ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास देऊळगाव राजा येथे मामाच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, तो मामाच्या गावाला पोहोचलाच नाही तसेच घरीही परत आला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
या प्रकरणी वैभवचे वडील शंकर भागाजी नागरे यांनी लोणार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन सानप करीत आहेत.
अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि तरुणांचे अचानक बेपत्ता होणे या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे ढग गडद झाले आहेत. वरील वर्णनाशी मिळतीजुळती कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ लोणार पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













