बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ज्या आईने आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि आयुष्य वेचले, त्याच आईला वृद्धापकाळात आपल्या हक्कासाठी चक्क गावभर भोंगा फिरवून आपली कैफियत ग्रामस्थांसमोर मांडण्याची वेळ आल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे समोर आली आहे. या वृद्ध मातेच्या भोंग्यातून उमटणारा प्रत्येक शब्द केवळ एका आईची तक्रार नसून, आयुष्याच्या संध्याकाळी आधार, सन्मान आणि हक्कासाठी सुरू असलेली तिची आर्त धडपड असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
घरातील वाद घरातच मिटावेत, नाती तुटू नयेत आणि कोणाचीही बदनामी होऊ नये, अशीच प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. मात्र, जेव्हा मनातील वेदना असह्य होतात आणि आपला आवाज घरातील व्यक्तींकडून ऐकला जात नाही, तेव्हा समाजासमोर आपली व्यथा मांडण्याची वेळ येते. चांडोळमधील या वृद्ध मातेनेही आपली व्यथा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भोंग्याचा आधार घेतल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त झाली. काही ग्रामस्थांनी वृद्ध मातेला धीर देत तिचे म्हणणे ऐकून घेतले, तर काहींनी हा कौटुंबिक प्रश्न संवादातून आणि सामोपचाराने सोडविण्याची गरज व्यक्त केली. वृद्धापकाळात आई-वडिलांना संपत्तीपेक्षा मुलांचा आधार, प्रेमाचे दोन शब्द, सुरक्षितता आणि सन्मानाची अधिक गरज असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही एका व्यक्तीला दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. कौटुंबिक वादाला अनेकदा दोन बाजू असतात. त्यामुळे संबंधित सर्वांनी एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत ज्येष्ठ व्यक्तीच्या सन्मानाचा विचार करून प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
न्याय आणि संरक्षणाची मागणी
या वृद्ध मातेने संबंधित यंत्रणेकडे निवेदन देऊन आपल्याला न्याय आणि संरक्षण मिळावे, अशी मागणी केल्याची माहिती आहे. प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणाची निष्पक्षपणे दखल घेत संबंधित दोन्ही बाजूंमध्ये संवाद घडवून आणावा आणि कायदेशीर व सामाजिकदृष्ट्या योग्य तो मार्ग काढावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
भोंग्याचा आवाज मोठा झाला की समाजाची संवेदनशीलता कमी झाली?
चांडोळमधील ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही. ती संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे. ज्या आईने आयुष्यभर आपल्या मुलांसाठी संघर्ष केला, तिलाच वृद्धापकाळात आपली व्यथा गावभर भोंगा फिरवून सांगावी लागत असेल, तर भोंग्याचा आवाज मोठा झाला आहे की समाजाची संवेदनशीलता कमी झाली आहे, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
आई-वडिलांना वृद्धापकाळात प्रेम, आधार, सन्मान आणि सुरक्षितता देणे ही केवळ सामाजिक नव्हे, तर प्रत्येक मुलाची नैतिक जबाबदारी आहे. चांडोळमधील या घटनेतून कुटुंबातील मतभेद कितीही मोठे असले तरी संवाद, संवेदना आणि सामोपचाराचा मार्ग सोडू नये, असा संदेश समाजासमोर आला आहे.
















