साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): साखरखेर्डा परिसरातील शिंदी गावावर अवघ्या २४ तासांत तिघांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. सलग घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत असून, तिघांवरही शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावातील ज्येष्ठ नागरिक गुलाबराव माधवराव खरात (वय ७८) यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार, ९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
ही घटना ताजी असतानाच गावातील ताराबाई भिकनसिंग राजपूत (वय ७९) यांचेही ९ जुलै रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एका रात्रीत दोन ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
या दोन घटनांनंतर दुसऱ्याच दिवशी, शुक्रवार १० जुलै रोजी भुजंगराव बाजीराव खरात (वय ७०) यांचे एसटी बसने प्रवास करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. बसचे चालक-वाहक आणि सहप्रवाशांनी तत्परता दाखवत त्यांना साखरखेर्डा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.













