सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या सकाळी ९ वाजल्यापासून घरासमोरच आंदोलन सुरू…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते उद्या सकाळी ९ वाजल्यापासून आपल्या घरासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत.
रविकांत तुपकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्ह येत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने आता अन्नत्याग आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुपकर म्हणाले की, “ही केवळ माझी लढाई नाही, तर राज्यातील प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याच्या न्यायासाठीची लढाई आहे. ही आरपारची लढाई असून, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”
या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा एकदा मोठी चळवळ उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून या आंदोलनावर काय भूमिका घेतली जाते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणता निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















