बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 72 तासांत मुली व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, दोन ते तीन दिवसांत तब्बल पाच जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलिसांत झाल्या आहेत. या सलग घटनांमुळे पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रकरणांत अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पेपर द्यायला गेली, पण कॉलेजलाच पोहोचली नाही !
चिखली तालुक्यातील देऊळगाव माळी येथील प्रल्हाद भराड यांची १७ वर्ष ८ महिने वयाची मुलगी रेवती भराड ही बारावीचा पेपर देण्यासाठी चिखली येथे गेली होती. मात्र ती कॉलेजमध्ये पोहोचलीच नाही. वडिलांनी कॉलेज व परिसरात शोध घेतला, पण ती सापडली नाही. अखेर अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार चिखली पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
घरातून न सांगता तरुणी झाली गायब….
शेगाव तालुक्यातील भास्तन येथील गौरी मिरगे (वय १९) ही १६ फेब्रुवारी रोजी सकाळी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला, मात्र तिचा काहीच मागमूस लागला नाही. या प्रकरणी जलंब पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
“बाथरूमला जाते” म्हणाली, पण परत आलीच नाही !
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील २१ वर्षीय रोहिणी मसुरकार ही रात्री बाथरूमला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा काहीही पत्ता लागला नाही. या प्रकरणी पोलिसांत मिसिंगची नोंद झाली आहे.
तीन दिवसांत आठ जण बेपत्ता; जिल्ह्यात खळबळ….
जिल्ह्यात सलग घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढत असल्याने पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.












