बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या १५ जूनपासून संपूर्ण कर्जमुक्ती साठीच्या अन्यथा आंदोलनाचा वणवा भडकला आहे. तुपकरांची तब्येत कमालीची बिघडत असतांना सरकारने अद्याप कोणतेही लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यभरात ठिकठिकाणी जाळपोळीसह आक्रमक आंदोलनाच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या रात्री जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज,१९ जूनला पाचवा दिवस उजाडला आहे. तुपकरांच्या पोटात अन्नाचा कण देखील नाही, त्यांची तब्येत कमालीची घसरली आहे. पांढऱ्या पेशी खूप वाढल्यात, शरीरात इन्फेक्शन वाढलं आहे. साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा खूप कमी झाली आहे. शासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून येत आहे. एसटी बस पेटवणे, खामगावचे एसडीओ कार्यालय, जामनेरात शासनाची गाडी पेटवणे, तलाठी कार्यालय, टोलनाके पेटवून दिल्याच्या घटनांसह जलसमाधी, रास्तारोको, आत्मदहन अशी आंदोलने सातत्याने राज्यभरात सुरू आहेत. दरम्यान आज पाचच्या दिवशीच्या पहाटे जाफ्राबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अज्ञात संतप्त शेतकरी आंदोलकांनी हे कार्यालय पेटवून दिल्याची माहिती आहे. दरम्यान आज पाचव्या दिवशी हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहचले असून शासनाचे दुर्लक्ष होतच राहिल्यास आंदोलन प्रचंड चिघळण्याची शक्यता आहे.













