चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांबाबत नकारात्मक चित्र रंगवले जात असताना मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने लोकसहभागाच्या जोरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत तब्बल ७ लाख रुपयांचा निधी उभारून शाळेचे रूपडे पूर्णपणे बदलले आहे.
या निधीतून शाळेत पारंपरिक काळ्या फळ्याऐवजी इंटरअॅक्टिव्ह पॅनल बसविण्यात आले असून, वर्गखोल्यांमध्ये शैक्षणिक चित्रे, माहिती फलक आणि डिजिटल माध्यमातून आधुनिक पद्धतीने अध्यापन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना खासगी आणि कॉन्व्हेंट शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण गावातच मिळू लागले आहे.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी खासगी आणि कॉन्व्हेंट शाळांना थेट आव्हान देत, “आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सामना घ्या, गुणवत्तेत आमचीच मुलं सरस ठरतील,” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. या सकारात्मक बदलाची दखल घेत दादा भुसे यांनीही शिक्षक आणि ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून घडलेले हे परिवर्तन इतर जिल्हा परिषद शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मग बाकी शिक्षकांना का जमत नाही?
दिवसा दिवस आता जिल्हा परिषद शाळा आता ओसाड पडणार असल्याची चर्चा सुरू आहे,पण आता मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांनी थेट खाजगी कॉन्व्हेन्ट वाल्यांना चॅलेंज दिली आहे.मग बाकी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना का जमत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे















