दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : १९ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसासह गारपीटीने दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वझर आघाव, येवती, कासारी, किनगाव जङ्क, भूमराळा, दुसरबीड, जऊळका आणि वसंत नगर या शिवारांमध्ये पिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हातात आलेली पिकेच गारांच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाली आहेत. कांदा, गहू, ज्वारी यांसह फळपीक आणि फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले असून त्यांच्या पुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देत, नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.या पाहणी दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.















