देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील आळंद परिसरात तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १५ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्रुबा ज्ञानबा घुले (वय ५१, रा. खापरखेडा ता. लोणार) हे गेल्या काही वर्षांपासून बटाईने शेती करण्यासाठी आळंद परिसरात येऊन शेतीचे काम करत होते. दरम्यान शेतात काम करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, तुटलेल्या विद्युत तारेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी महावितरणावर केला आहे. तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.













