बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)गेल्या पाच दिवसांपासून सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या निवासस्थानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच अखेर सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकरी आणि तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी मंत्री महाजन यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत येत्या चार ते पाच दिवसांत शासनस्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पुढील प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चेदरम्यान रविकांत तुपकर यांनी कर्जमुक्ती समितीची स्थापना करून त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध शेतकरी नेत्यांचा समावेश करावा, अशी ठाम मागणी केली. सरकारसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय झाला नाही, तर पुन्हा एकदा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि चर्चेला पुढे नेण्याचे आश्वासन मिळाल्याने रविकांत तुपकर यांनी आपल्या मातोश्रींच्या हस्ते अन्नग्रहण करून अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
दरम्यान, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात तुपकर यांना यश आल्याची भावना आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आता येत्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत सरकार नेमका कोणता निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.













