संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यात २७ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन केली.
महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकूण २४ गावांमधील १५८६ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये वसाळी, हडीया महल, सावळा, मारोड, धामणगाव, सायखेड, अकोली बु., अकोली खु., राजपूर, मालठाणा बु., मालठाणा खु., गोपाळखेड, झाशी, निमखेड, पळशी, करमोडा, शिवनी, लोहगाव बु., लोहगाव खु., शेवगा बु., शेवगा खु., लाडनापूर भाग-१ व चिचारी या गावांचा समावेश आहे.
या अवकाळीमुळे हरभरा, गहू, मका, संत्रा, टरबुज तसेच इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतांमध्ये पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.














