चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील मंगरूळ प्रा खेडा येथील शिव बहुउद्देशीय क्रीडा व शिक्षण संस्था, यांच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, या मागणीसाठी अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष दामोदर शिंदे, गजानन सुरसे व इतर ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, चिखली यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले की, २०२२ पासून जलजीवन मिशनचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. ग्रामपंचायतीमार्फत तसेच संबंधित विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून कोणतीही पर्यायी योजना कार्यान्वित नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. ०५ मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण न झाल्यास ०९ मार्च २०२६ पासून संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.















