खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज)तेलंगणा ते जळगाव खान्देश या प्रवासात बेपत्ता झालेल्या पाटील दाम्पत्याचा अखेर मृतदेह कारसह सापडला आहे. जितू उर्फ पदमसिंह राजपूत पाटील आणि पत्नी नम्रता हे दोघे गेल्या दोन दिवसांपासून संपर्कात नसल्याने त्यांच्या नातेवाईकांकडून शोधमोहीम राबवण्यात येत होती.
हे दाम्पत्य २७ नोव्हेंबर रोजी सीतापुरम (तेलंगणा) येथून डोलारखेड (जळगाव खान्देश) येथे होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी MH 13 BN 8583 या कारने निघाले होते. पण ते ठराविक ठिकाणी न पोहोचल्याने संशय निर्माण झाला. त्यांचे मोबाईलही बंद येत होते.
२७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:11 वाजता बाळापूरजवळील तरोडा टोल नाका ओलांडताना त्यांच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यानंतर मोबाइलचे शेवटचे लोकेशन वडनेर भोलजी परिसरात नोंदले गेले.
२९ नोव्हेंबर रोजी वडनेर भोलजीजवळील विश्वगंगा हॉटेल लगतच्या ओसाड विहिरीत कार पडल्याची माहिती नांदुरा पोस्टचे एपीआय संजय पवार यांना मिळाली. तत्काळ ठाणेदार जयवंत सातव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत कार पडल्याचे दिसून आले.
यानंतर ओम साई फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने जवळपास ३ तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनने कार बाहेर काढली. कारमध्येच पाटील दाम्पत्याचे मृतदेह आढळले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एसपी श्रेणिक लोढा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेहांना मलकापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
प्रकरणी सध्या तपास सुरू असून पुढील कारणमीमांसा पोलीस करीत आहेत.













