लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर, लोणार आणि सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचेवर जोरदार निशाणा साधला आहे.
तुपकर म्हणाले की,”लोकप्रतिनिधींनी फक्त बांधावर येऊन फोटोसेशन करु नये, ताबडतोब मुंबई जाऊन तळ ठोकून बसा आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई घेऊनच मग वावरात या, आठवडाभरात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदतीची व्यवस्था झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची शक्यता आहे.
या दोन दिवसात नुकसानग्रस्त भागाचा अनेक नेत्यांनी दौरा केला. त्यामध्ये ना. प्रतापराव जाधव, शेतकरी नेते रविकांत तुपकर, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे माजी आमदार संजय रायमूलकर,यांचा समावेश आहे.सत्ता धारी नेत्यांच्या या दौऱ्यावर रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे. नुसतं फोटोसेशन करून दिखावा करू नका. कोरडी सहानुभूती दाखवू नका.. तुम्ही सत्तेत आहात,मंत्री आहात तर मुंबईत तळ ठोकून बसा आणि स्पेशल पॅकेज घेऊन या असा सल्लाही तुपकरांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांना दिला.”आश्वासनं देऊन वेळ मारून नेऊ नका, शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
नुकसान ग्रस्तांसाठी तुपकरांची आक्रमक भूमिका :
२७-२८ जून रोजी मेहकर,लोणार, सिंदखेड राजा भागात तुपकरांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आपबीती समजून घेतली. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली नाहीतर आक्रमक आंदोलन उभं करू.. असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला.ते म्हणाले, “परिस्थिती खूपच गंभीर आहे. पेरणी झालेली शेतजमीन खरडून गेली आहे. अशा वेळी सरकार आणि लोकप्रतिनिधींनी केवळ सहवेदना व्यक्त करत थांबू नये, तर तत्काळ मदत देण्यासाठी ऑन द स्पॉट निर्णय घ्यावेत.”