सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने येत्या १४ जुलै २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार असून, यात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या नियोजनासाठी नुकतीच सिंदखेडराजा येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. शिंगणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारला जाब विचारण्याची तयारी दर्शवली.
BREAKING: बुलडाणा जिल्हा हादरला! आठ दिवसात दुसरी घटना; मलकापुरात पत्नी आणि मुलाने मिळून केला मर्डर!
या बैठकीला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघांचे संचालक, बूथप्रमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांवर चर्चा झाली. यामध्ये खतांच्या वाढत्या किंमती, पीकविमा योजनेचे अपुरे धोरण, शेतमालाला मिळणारे कमी भाव, शेतमाल विक्रीत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, कृषी विभागातील भ्रष्टाचार, वीजपुरवठ्याच्या समस्या आणि रोहीसारख्या वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यांचा समावेश आहे. या सर्व मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. शिंगणे यांनी बैठकीत सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. या मोर्चातून आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करू आणि त्यांच्या हक्कांसाठी लढू.” तसेच, येत्या १४ जुलै रोजी मोर्चादरम्यान ते सर्व मुद्द्यांवर सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की, डॉ. शिंगणे नेमके काय बोलणार आणि कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार?
या बैठकीत परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यासंदर्भात एक ठरावही संमत करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल भट यांनी केले, तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी केले.
हा मोर्चा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी दबाव निर्माण करणारा ठरणार आहे. सिंदखेडराजा येथील हा मोर्चा राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध एक मोठा एल्गार ठरेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
1 thought on “सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!”