बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):आम्ही मत पेटीतून जन्माला घातलेल्या बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करून आपले स्थान विसरू नये, असा खरमरीत इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी दिला आहे.
माजी मंत्री तथा भाजप नेते आ. बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेले वक्तव्य अपमानकारक असून, त्याचा निषेध विनायक सरनाईक यांनी केला आहे. “शेतकऱ्यांनी कुठल्याच योजना मागितल्या नव्हत्या. त्या योजना सरकारने सत्तेत येण्यासाठी आणल्या. त्यामुळे सरकारने कुठलेही उपकार केलेले नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरनाईक म्हणाले, “लोकशाहीत जनता हीच मालक असते, आणि निवडून दिलेल्या नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्यांच्या मतांमुळे सत्तेत आलात, त्यांच्याच विरोधात बोलणं हे निंदनीय आहे. अशा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता घरचा रस्ता दाखवायला हवा.”
“शेतकरी मालक आहेत आणि तुम्ही सेवक आहात हे लोणीकरांनी विसरू नये. जर असंच चालू राहिलं, तर शेतकरी यापुढे अशा नेत्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत,” असा रोखठोक इशाराही सरनाईक यांनी दिला आहे.