बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गेल्या अनेक वर्षांपासून शेती, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी लढणारे कृषी योद्धा फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेश्वर खरात पाटील आता नव्या वाटचालीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा, विचारांची दिशा ,धारदार वक्तृत्व आणि आंदोलनशील कार्यपद्धती पाहता, शेतकरी संघटनेच्या विचारवंत मार्गावर त्यांची पावले वळताना दिसत आहेत.
खरात हे शेती क्षेत्रातील अनुभवी अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पिकांच्या संरक्षणासाठी, शाश्वत शेतीसाठी व शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती देण्यासाठी ते सोशल मीडियावरून सातत्याने मार्गदर्शन करत असतात. साडेतीन लाखांहून अधिक लोक त्यांना यूट्यूबला फॉलो करतात.पिकविमा, उत्पादन खर्च, विक्री धोरण, सरकारी योजना याबाबत ते नेहमी शेतकऱ्यांना सजग करत आले आहेत.
त्यांचे विचार आणि कार्य स्व. शरद जोशी साहेबांच्या तत्त्वांशी प्रेरित असल्याचे वारंवार त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्षाची वाट निवडली आहे.
कृषी योद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने उभारली, शासन दरबारी पाठपुरावा केला आणि अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची दखल आता राजकीय व सामाजिक वर्तुळातही घेतली जात आहे.
सध्या, खरात यांच्या शेतकरी संघटनेच्या वाटचालीकडे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सजग राहणाऱ्या नेतृत्वाची उणीव भासत असलेल्या काळात, खरात यांचा सक्रिय सहभाग ही एक नवी आशा ठरू शकते.येणाऱ्या 19/20 तारखेला पक्षाच्या देवगड येथील बैठकीत लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे..