सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुलतानपूर परिसरातील लोक सध्या रस्त्याला आणि रस्त्यावरील खड्ड्याले वैतागले आहेत…सुलतानपूर येथील डॉ. आर. एन. लाहोटी कॉलेज रोडवरील राज्यमार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याला अक्षरशः गटाराचे स्वरूप आले असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हा मार्ग डॉ. आर. एन. लाहोटी कॉलेज, श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, विविध शैक्षणिक संस्था तसेच पशुपतीनाथ मंदिर आणि वेदांत आश्रम यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. दररोज शेकडो विद्यार्थी, रुग्ण, भाविक आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अखेर २८ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. पक्षाचे स्थानिक नेते महेंद्र पनाह यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्प, दीप आणि धूप अर्पण करून ‘महाआरती’ केली. “रस्त्यावरील खड्डे आता देवस्थानच झाले आहेत,” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महेंद्र पनाह यांनी इशारा देत सांगितले की, या रस्त्यासाठी ताबडतोब रस्ता दुरुस्ती करण्यात आला नाही तर परिसरातील नागरिक सोबत घेऊन रस्ता रस्ता सुरू झाल्या शिवाय उठणार नाही असा खडक इशारा दिला जात आहे… आंदोलनात दिलीप पनाह यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, मागील आठवड्यात बारावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर खड्ड्यातील साचलेले घाण पाणी उडाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे विद्यार्थ्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. सुदैवाने एका मित्राने मदत केल्याने तो वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला. ही घटना रस्त्याच्या दयनीय अवस्थेचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
















