खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील एका विवाहितेचा हिंगोली जिल्ह्यात सासरच्या लोकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौ. अश्विनी युवराज वाघमोडे (वय २८, रा. गोंधनापूर, ता. खामगाव) यांचा विवाह हिंगोली जिल्ह्यातील कोथळज येथील युवराज दीपक वाघमोडे यांच्याशी झाला होता.
मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला आणि तसे न केल्यास तिला सासरी चांगली वागणूक देणार नसल्याची धमकी दिली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौ. अश्विनी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पती युवराज दीपक वाघमोडे, दीपक तुकाराम वाघमोडे, मनोज दीपक वाघमोडे, वंदना दीपक वाघमोडे (सर्व रा. कोथळज, ता. जि. हिंगोली) तसेच अवधूत बबन म्हस्के, क्रांती अवधूत म्हस्के, रंगराव बबन म्हस्के आणि रोहिणी रंगराव म्हस्के (सर्व रा. धनसळ, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी एकत्र येऊन तिचा छळ केला.
सासरच्या मंडळींनी १७ ऑगस्ट २०२४ पूर्वी तिला माहेरहून दोन लाख रुपये आणण्यास सांगितले आणि तसे न केल्यास तिला सासरी वागणूक देणार नसल्याचे स्पष्ट केले. या कालावधीत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला.
या तक्रारीच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोहेकॉ भगवान काळबागे करत आहेत. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे गोंधनापूर परिसरात संताप व्यक्त होत असून, महिलांवरील अशा अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.