मेरा बु. (कैलास आंधळे:बुलडाणा कव्हरेज न्युज): टाकरखेड वायाळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय नवविवाहित दिपाली वैभव बनसोडे हिने मंगळवारी (५ ऑगस्ट) दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दु:खद घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता.मिसाळवाडी येथील रहिवासी दिपाली साळवे हिचा विवाह १९ एप्रिल २०२५ रोजी वैभव बनसोडे या तरुणाशी टाकरखेड वायाळ येथे समाजाच्या रीतिरिवाजानुसार पार पडला होता.
दिपाली ५ ऑगस्ट रोजी शेतात कामासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास ती ‘शौचाला जाते’ असे सांगून बाहेर गेली. मात्र बराच वेळ होऊनही परत न आल्याने इतर महिलांनी शोध घेतला.जवळच्या विहिरीकडे पाहिल्यावर पाण्यावर तिच्या चपला तरंगताना दिसल्या, त्यामुळे महिलांनी आरडाओरडा करून इतरांना बोलावले. काही क्षणांतच गावातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
घटनेची माहिती अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राही, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम आणि बीट जमादार गजानन वाघ यांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.वृत्त लिहेपर्यंत मृतदेह विहिरीतून बाहेर काढलेला नव्हता, तसेच पंचनामा प्रक्रियाही सुरू झाली नव्हती. या घटनेमुळे टाकरखेड वायाळ आणि मिसाळवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.