अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील अंत्रीखेडेकर येथे शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. मका पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले रतन लक्ष्मण चांदले (वय ५५) यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणी व मानसिक तणाव यांचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे अंत्रीखेडेकर व परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या शेतकरी आत्महत्यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. शेतीवरील वाढता खर्च, अपुरा बाजारभाव आणि कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी हतबल होत असल्याचे चित्र दिसून येत असून, शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.










