मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतजमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना १८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कोथळी शिवारात घडली. या प्रकरणात रात्री उशिरा दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने बोराखेडी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली फिर्याद – नम्रता नरवाडे यांचा आरोपजनुना येथील नम्रता नीलेश नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आणि इतर साक्षीदार १८ मे रोजी सकाळी कोथळी शिवारातील गट क्रमांक २९९ मध्ये पेरणीपूर्व मशागतीसाठी गेले असता, प्रकाश हरीचंद्र सरोदे, गजानन हरीचंद्र सरोदे, तसेच प्रकाशची पत्नी आणि मुलगा – अशा चौघांनी जातीवाचक शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली.
या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेले गणेश उमाळे, संजय पाटील आणि सुहास पाटील यांनाही लाठ्याकाठ्यांनी आणि कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित चौघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी फिर्याद – प्रकाश सरोदे यांचा आरोपदरम्यान, इब्राहिमपूर येथील प्रकाश सरोदे यांनी दुसरी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी नमूद केले आहे की, १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते आणि साक्षीदार कोथळीतील गट क्रमांक २९९ मध्ये काम करत असताना, वडगावचे सुहास पाटील व त्यांचा मुलगा, संजय पाटील (खेडगाव), गणेश उमाळे (नांदुरा तालुका), नम्रता आणि नीलेश नरवाडे (जनुना) – या सहाजणांनी मिळून गैरकायद्याची गर्दी करून त्यांच्या शेतात वाद घातला.या तक्रारीवरून पोलिसांनी नमूद सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सुरू….
सध्या पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवून चौकशी सुरू केली आहे. शेतजमिनीच्या वादातून निर्माण झालेला हा प्रकार परिसरात चांगलाच गाजत असून, पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.