पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करणार असून, योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘वारकरी भक्तियोग’ या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यासोबतच त्यांनी आळंदी परिसरात कत्तलखाना उभारण्यास स्पष्ट नकार देताना तिथले आरक्षण हटवण्याचे आदेश स्वतः दिल्याचे सांगितले. तसेच, राज्यात लवकरच प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Saur Pump Yojana: सौरचलित फवारणी पंप 2025 साठी मोबाईलवरून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा?
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत ठाम भूमिका मांडताना सांगितले की, सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. “दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही, आम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळू. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतला जाईल. यासाठी काही नियम आणि प्रक्रिया आहेत, त्यानुसार पावले उचलली जातील,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आळंदी परिसरातील कत्तलखाना वादावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता आणली. “आळंदी किंवा त्याच्या जवळील मोशी परिसरात कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना उभारला जाणार नाही. याबाबतचे आरक्षण हटवण्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. आळंदी हे वारकरी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने तिथे अशा प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे.
याशिवाय, उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक भरतीबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली. “उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरतीसाठी सर्व आवश्यक मान्यता दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात ही प्रक्रिया सुरू होईल,” असे फडणवीस यांनी सांगितले. यामुळे शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यास गती मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळे शेतकरी, वारकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक घटकांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयांचे स्वागत होत असून, त्याची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.