बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — प्रधानमंत्री पिकविमा योजना (खरीप हंगाम २०२४-२५) अंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकूण ६२८ कोटी ८० लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, यापैकी ३३३ कोटी ५४ लाख ८३ हजार ९२५ रुपये यापूर्वीच वाटप करण्यात आले आहेत. आता अतिरिक्त २१२ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी यापूर्वी विमा हप्ता भरूनही नुकसानभरपाईपासून वंचित राहिले होते. या अन्यायाविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून, प्रशासनाशी बैठक घेतली आणि आंदोलने केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ६४,९४५ शेतकऱ्यांना पिकविमा भरपाई मिळणार आहे.
प्रधानमंत्री पिकविमा योजनेतून शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४-२५ साठी एकूण १२१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर झाली असून, ती हळूहळू सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
या पार्श्वभूमीवर तुपकर म्हणाले…
“हा विजय शेतकऱ्यांचा आहे, संघर्षाचा आहे. पिकविमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे, कंपन्यांसाठी नाही, हे आम्ही आंदोलनातून दाखवून दिलं. अनेक शेतकऱ्यांना आता योग्य नुकसानभरपाई मिळत आहे, हीच खरी लोकशाही आहे.”














