चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे पांढरदेव, अंबाशी आणि परिसरातील गावांत पावसाने हाहाकार माजवला. शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले, काहींची घरे कोसळली, तर काहींच्या जगण्याचा आधारच वाहून गेला. अशातच जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फक्त ‘लाडकी बहीण’महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावली, पण ढगफुटीग्रस्त भागात पायसुद्धा ठेवला नाही.
जिल्ह्यात शेतकरी अडचणीत आहे. नुकतेच भरोसा गावात एका शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली, पण महसूल मंत्र्यांनी त्यांच्याही घरी जाणे टाळले. पिकं वाहून गेली, जनावरांच्या चार्याची टंचाई निर्माण झाली, शेतकरी हातातोंडाशी आलेलं पीक गमावून हवालदिल आहे, आणि अशा वेळी मंत्रीसाहेबांचे लक्ष मात्र उद्घाटनाच्या फितीकडे!
गावोगाव सध्या एकच चर्चा …
“जेव्हा निवडणुकीचा काळ येतो, तेव्हा नेते शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतात, पण खरी गरज असताना कोणीच सोबत नसतं. आता जेव्हा निसर्गाने हातातलं हिरावून घेतलं, तेव्हा मदतीच्या घोषणा तरी का होत नाहीत? मंत्री जिल्ह्यात असतानाच पिकांची पाहणी करून, तातडीने मदत जाहीर केली असती, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला असता.”
पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतात उभा शेतकरी आज केवळ पाणीच नव्हे, तर सरकारच्या बेफिकिरीनेही भिजला आहे. घोषणांमध्ये आणि भाषणांत ‘शेतकरी आमचे कुटुंबीय’ म्हणणारे नेते, संकटाच्या वेळी मात्र पाऊल मागे घेतात. आणि मग, शेतकऱ्याला प्रश्न पडतो –
“आम्ही महत्त्वाचे फक्त मतपेटीसाठीच का?
काल झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्याचा नुकसान आणि काही गावात घरामध्ये पाणी घुसले त्यामुळे नुकसान झालाय, महसूलमंत्र्यांना लोकप्रतिनिधींनी कळवलं नाही का? किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी त्यांना कळवले नाही का? का मुद्दामून दुर्लक्ष केले! असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित झाला….