साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैयक्तिक वादामुळे प्रियकराचा खून करून मृतदेह गोदावरी नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी एक आरोपी आधीपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहे.
अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने १८ ऑगस्ट रोजी तांदुळवाडी शिवारातून भारती रवींद्र दुबे (३४, सिडको, छत्रपती संभाजीनगर) आणि दुर्गेश मदन तिवारी (खुलताबाद) यांना अटक केली. यापूर्वी संशयित अफरोज खान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही कारवाई साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पुंडलिक औताडे (३२) यांचा भारती दुबे हिच्याशी परिचय होता आणि त्यातून दोघांत जवळीक निर्माण झाली होती. मात्र नंतर वाद निर्माण झाला. एका विवाहसोहळ्यानंतर सचिन आणि भारती छत्रपती संभाजीनगरात गेले होते. त्याच रात्री भारतीने मामेभाऊ दुर्गेश तिवारी आणि मित्र अफरोज खान यांच्या मदतीने सचिनचा खून केल्याचा आरोप आहे.
खून केल्यानंतर सचिनचा मृतदेह प्लास्टिक ताडपत्रीत गुंडाळून पैठणजवळील गोदावरी नदीच्या पात्रात फेकण्यात आला. शेवगाव तालुक्यातील मुंगी गावालगत नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर हा खून उघडकीस आला.











