मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा २०२३ आणि २०२४ चा पिकविमा अद्याप प्रलंबित आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या (एआयसी) कार्यालयात धडक देत राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. प्रभाकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत सविस्तर चर्चा करत कंपनीला जाब विचारला आणि आक्रमक भूमिका घेतली.

तुपकर यांनी एआयसीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून जास्त नुकसान दाखवण्यासाठी पैसे उकळतात. पंचनाम्याच्या फॉर्मवर कृषी सहायक, सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या सह्या आवश्यक असतानाही, कर्मचारी परस्पर कमी नुकसान दाखवून फॉर्म भरतात. यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्यापासून वंचित राहावे लागत आहे.” तुपकर यांनी कंपनी आणि सरकार यांच्यातील साटेलोटे असल्याचा आरोपही केला. त्यांच्या मते, विमा कंपनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून, शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
तुपकरांनी यावेळी कंपनीला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळाली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एआयसीच्या मुंबई कार्यालयात घुसून तीव्र आंदोलन करेल.” त्यांनी खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी लावून धरली.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून पिकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापूर्वीही तुपकर यांनी या मुद्द्यावर आंदोलने केली असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता कंपनी आणि सरकार यांच्याकडून याबाबत काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!…तुपकर आक्रमक!”