चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुक्यातील आन्वी ग्रामपंचायत कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियमित गैरहजेरीमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार चिखली यांना निवेदन देत, १५ जून रोजी ढोलताशा आणि डफडे वाजवत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वैमव अरुण पवार (वय ३१) आणि अक्षय गौतम घेवंदे (वय २४, रा. आन्ची) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आन्वी ग्रामपंचायत ही शेलगाव जहागीर गट ग्रामपंचायतीअंतर्गत येते. याठिकाणी नियमानुसार आठवड्यातून ठराविक दिवशी कर्मचारी उपस्थित राहून ग्रामस्थांची कामे पार पाडणे अपेक्षित आहे.
मात्र, ठराव असूनही कर्मचारी गावात उपस्थित राहत नाहीत.या गैरहजेरीमुळे शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारी कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेले नागरिक रिकाम्या हाताने परत येतात, ज्यामुळे नाराजीचा सूर अधिकच चढला आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीविरोधात आवाज उठवत १५ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत आन्वी येथे ढोलताशा आणि डफडे वाजवत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तसेच, ही माहिती तहसीलदार चिखली आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिखली यांना सुद्धा सादर करण्यात आली आहे.गावकऱ्यांच्या या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या आंदोलनाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे