लोणार (सतिश जगदाळे:-बुलडाणा कव्हरेज न्यूज) राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरवर्षी साधारणपणे ७ जूननंतर मान्सूनची एंट्री होते. मात्र, यावर्षी तो एक आठवडा लवकर म्हणजे मे अखेरीसच दाखल होण्याची चिन्हे आहेत.हवामान खात्याच्या या अंदाजामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी उत्सुक झाले असले, तरी कृषी विभागाने याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पावसाच्या सुरुवातीच्या सरींवर विसंबून पेरणी करणे टाळावे, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
“मान्सून स्थिर आणि संपूर्णपणे राज्यात दाखल झाल्यानंतरच पेरणी करावी. अन्यथा उगम टप्प्यातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे,” असे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या पुढील इशाऱ्यांची वाट पाहत पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.