बुलडाणा (ऋषी भोपळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): राजकीय घडामोडींनी सध्या जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या. असा त्यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या “भाऊ, आम्ही येतो तिकडे, पण निवडणुकीचं तिकीट मिळणार का?” असा सवाल अनेक अनेक इच्छुक कार्यकर्ते विचारत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार का?की दुसऱ्या पक्षातून नुकताच आयात केलेल्या ‘धनदांडग्या’ नवख्या चेहऱ्यांना संधी मिळणार? ही चर्चा आता जोर धरू लागली आहे.
इच्छुक उमेदवार नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवत आहे. सद्या गावागावात दगडाखाली नेते तयार झालेले आहे अनेकांनी सर्कलमध्ये पायपीट सुरू केली आहे. पण तिकीट वाटपाच्या राजकारणात निष्ठा महत्त्वाची ठरणार की 'पैसा आणि प्रभाव'? हाच खरा प्रश्न आहे.
दुसऱ्या पक्षातील आयात कार्यकर्त्यामुळे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला जात आहे"पक्षासाठी एवढं सगळं करूनही जर दुसऱ्यालाच संधी मिळत असेल तर आम्ही कार्यकर्ते काय मूर्ख आहोत का?" असा सवाल कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहेत तर काहीजण अजूनही पक्षाशी एकनिष्ठ राहून "तिकीट मिळो किंवा न मिळो, मी काम करत राहणार" अशा भूमिकेत आहेत.
येत्या काळात अनेकांनी ‘निष्ठावान’ चेहरा दाखवत नवे पक्ष गाठले तर नवल वाटू नये. कारण शेवटी, हे राजकारण आहे. येथे काहीही होऊ शकतं! कालचा कार्यकर्ता आजचा नेता होऊ शकतो आणि आजचा लायक कार्यकर्ता उद्या दुर्लक्षित देखील होऊ शकतो.
परंतु मतदारही आता जागरूक झाले आहेत. तिकीट कुणाला मिळतं यापेक्षा, मत कुणाला देतो, हे ठरवताना मतदार ‘कोण काय काम केलंय?’ यावर भर देणार हे मात्र नक्की!