शेगाव, (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळला नाही, त्या शेतकऱ्यांना त्वरित पिकविमा द्यावा, या दोन प्रमुख मागण्यांसह शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संतनगरी शेगाव येथे शेतकऱ्यांचा एल्गार आयोजित करण्यात आला आहे. १० जून रोजी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी एल्गार मेळावे घेऊन शेतकऱ्यांना एकत्रित करून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत.
संपूर्ण कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांचा हक्काचा पिकविमा तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, सक्तीची कर्जवसुली तातडीने थांबवावी, पिकांचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, सोयाबीनला आठ ते दहा आणि कापसाला १२ ते १४ हजार रुपये भाव मिळावा, या सह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत.
नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर, कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड आदी जिल्ह्यांमध्ये दौरा करून रविकांत तुपकर यांनी २७ मे रोजी सिंदखेड राजा येथे आयोजित एल्गार मेळाव्यात सरकारच्या विरोधात तोफ डागली. त्यानंतर आता १० जून रोजी विदर्भ पंढरी, संतनगरी शेगाव येथे एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व ज्या शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पावत्या घेऊन शेगाव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.