छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी गावात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्यांच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कोणीतरी फसवून मुलींना पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून दोन्ही मुलींचा शोध सुरू केला आहे.
17 जून रोजी वडील काही दिवसांसाठी आपल्या मूळ गावी, सावडी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे गेले होते. त्या वेळी दोन्ही मुली घरी होत्या. दरम्यान, रांजणगावातील हरिओमनगर येथे राहणारे त्यांचे मेव्हणे आहेत. 19 जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मेव्हण्याची मुले त्यांच्या घरी गेली असता, घर बंद होते आणि दोन्ही मुली घरी नव्हत्या. त्यांनी ही माहिती फोनवरून मुलींच्या वडिलांना कळवली.
मुली बेपत्ता असल्याचे समजताच वडील तातडीने नांदेडवरून परत आले आणि सर्वत्र शोधाशोध सुरू केली. शेजाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही मुली ‘मैत्रिणीकडे जाऊन येतो’ असे सांगून गेल्या होत्या, परंतु त्या परत आल्या नाहीत. नातेवाईक आणि मैत्रिणींकडे चौकशी केली, पण मुली कुठेच सापडल्या नाहीत.
मुलींबद्दल माहिती
- एक मुलगी सातवीत, तर दुसरी आठवीत शिकते.
- एकीने गुलाबी रंगाचा आणि दुसरीने लाल रंगाचा ड्रेस घातला होता.
- दोघीही घरातून परस्पर निघून गेल्या असून अद्याप परत आलेल्या नाहीत.
पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, दोन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
1 thought on “सख्या दोन बहिणी मैत्रिणींकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेल्या. त्यानंतर परत आल्या नाही….”