जालना (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील दावलवाडी गावात राहणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण तिच्या वडिलांना लागली आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीने त्याने स्वतःच्या मुलीचा जीव घेतला. हा खून लपवण्यासाठी त्याने चक्क आत्महत्येचा बनाव रचला आणि मुलीला दोरीने लटकवले. पण पोलिसांच्या सतर्क तपासामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, अन्यथा जगाला ही आत्महत्याच वाटली असती.
मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी
५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या गस्ती दरम्यान बदनापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष कुकलारे यांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. त्यात दावलवाडी गावातील हरी बाबुराव जोगदंड यांच्या मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. लगेचच कुकलारे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. तेथे पाहणी केली असता, त्यांना हे प्रकरण आत्महत्या नसून काहीतरी वेगळेच असल्याचा संशय आला. मुलीच्या मृतदेहावर असलेल्या खुणा आणि परिस्थिती पाहता, हे साधे आत्महत्येचे प्रकरण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. तपासात असे समोर आले की, मृत तरुणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. हे वडिलांना कळताच, त्यांना गावात आणि समाजात अपमान होण्याची भीती वाटली. यातूनच हरी बाबुराव जोगदंड याने मुलीचा गळा दाबून तिचा खून केला. नंतर खून लपवण्यासाठी तिच्या गळ्यात दोरी बांधून लोखंडी अँगलला लटकवले. या बनावातून ही आत्महत्या वाटावी असा प्रयत्न केला गेला.
पोलिसांनी मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर निरीक्षक सुरवसे यांनी हरी बाबुराव जोगदंड यांची प्राथमिक चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रेमप्रकरणामुळे होणाऱ्या अपमानाच्या भीतीने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले आणि बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक निरीक्षक करेवार करत आहेत.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून होणाऱ्या अशा हिंसक कृत्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सतर्कता दाखवून सत्य उघड केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.