
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.
शेतकऱ्यांनी सांगितले की, तालुक्यातील काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असले, तरी देऊळगाव घुबे आणि इतर काही गावांचे शेतकरी अजूनही वंचित आहेत. यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या शेताचे पंचनामे झालेले असूनही त्याचा लाभ मिळालेला नाही. “आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार? आणि मिळणार की नाही?” असे प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी विचारले. यामुळे उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना उत्तरं देताना अडचणींचा सामना करावा लागला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर न्याय घेतल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही. प्रशासन आणि विमा कंपन्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.